Friday, 8 February 2013

देवकी


देवकी

’खरंच का कृष्णाने सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणा म्हणून, त्यांचा मृत पुत्र आणून दिला ? केवढा मोठा झाला आहे माझा कृष्ण–’ देवकी स्वतःशीच विचार करीत होती. ही वार्ता कळल्यावर तिला आश्‍चर्य वाटले होते आणि अभिमानही !
’मृत पुत्र परत आणता येतो ? तो परत भेटू शकतो ?…पण कृष्णाने आणला नाही का ? त्याचा अधिकार केवढा वाढला आहे. त्याने गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींची मनोकामना पूर्ण केली. माझी इच्छा तो पूर्ण करील का ? कंसाने मारलेल्या माझ्या सहा पुत्रांचे दर्शन मला पुन्हा घडेल का ? त्यांची आठवण झाली की जीव कसा व्याकुळ होतो. वाटतं, त्यांना मांडीवर घ्यावं. कुरवाळावं. त्यांना स्तनपान करावं. कुठं असतील ती मुलं…मला पुन्हा कशी दिसतील…’
देवकी मृत मुलांच्या आठवणीने भावाकुल झाली. त्या नवजात बालकांच्या आठवणींच्या तळाशी असणारे अस्पष्‍ट चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. तिचे डोळे भरुन आले; आणि त्या धूसर दृष्‍टीतून ती खोल भूतकाळात गेली. तिला तिच्या विवाहापासूनच्या सार्‍या घटना डोळ्यांसमोर दिसू लागल्या.
देवकीचा विवाह वसुदेवाशी थाटामाटात पार पडला. नवविवाहिता देवकी वसुदेवासह रथात बसली. सासरी जाण्यास निघाली.
कंस हा तिचा चुलत भाऊ. बहिणीवर नितांत प्रेम. देवकी सासरी निघालेली पाहून तिला निरोप द्यायला तो आला. तिला बरं वाटावं म्हणून रथावर चढला. घोडयांचे लगाम हाती घेतले. देवकीने सर्वांचा निरोप घेतला. मंगल वाद्ये वाजू लागली. आणि लवाजम्यासह देवकी निघाली. कंस स्वतः रथ हाकीत होता. संथ गतीने ती वरात पुढे सरकत होती. सगळीकडे आनंद भरुन राहिला होता. देवकी-वसुदेवही सुखसागरात चिंब झाले होते. भावी जीवनाची स्वप्‍नं पाहत होते. भगिनीच्या विवाहाचा आनंद कंसाच्या मुखावरही दिसत होता. आणि एवढयात आकाशात मेघाशिवाय विजा चमकल्या. त्या दिव्य तेजाने सारे दीपले. अनेकांची नजर आकाशाकडे लागली. क्षणार्धात ढगाम्चा गडगडाट व्हावा तसा आवाज झाला. भीतीची एक हलकीशी लहर सगळ्यांच्या मनातून लहरुन गेली. सगळ्यांचे लक्ष आकाशाकडे असतानाच त्यांच्या कानांवर शब्द आले,”कंसा ! मूर्खा…जिच्या रथाचे घोडे तू आनंदाने हाकीत आहेस, त्या देवकीचाच आठवा मुलगा तुला ठार मारणार आहे.”
आकाशवाणीचे ते शब्द ऐकताच कंसाचा नूर बदलला. आपल्याच बहिणीचा मुलगा आपला नाश करणार आहे, हे समजताच तो संतापला. रागाने लाल झाला. त्याने घोडयांचे लगाम सोडून दिले. रथाखाली उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी तो तिच्या अंगावर धावून गेला. तिची वेणी एका हातात धरली. तिला रथाखाली ओढून तिच्यावर वार करणार तोच वसुदेव विजेच्या चपलतेने पुढे सरसावले. त्यांनी कंसाला अडवीत म्हटले, “राजकुमार, आपण भोजवंशाचे कुलदीपक. मोठमोठे शूरवीर आपल्या गुणांचे कौतुक करतात. शौर्याचे गोडवे गातात. आणि आता आपण हे काय करता आहात ? अहो, देवकी ही आपली बहीण आहे, ती स्‍त्री आहे आणि शिवाय आत्ताच तिचा विवाह झाला आहे. अशा मंगल प्रसंगी आपण तिला मारणार ?”
“वसुदेवा, हिला जिवंत ठेवणं म्हणजे माझ्या मृत्यूला जिवंत ठेवण्यासारखे आहे. कोणता विचारी पुरुष आपल्या हाताने मृत्यूची जोपासना करील ?”
“अरे, तू जरा विचार कर, जो जन्म घेतो त्याला मृत्यू अटळ असतो. जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म होत असतो. आज नाही तर शंभर वर्षांनी पण मृत्यू हा येणारच. आल्या प्राण्याला जावं लागणारच. तेव्हा…”
“मी हिला सोडून देऊ–असंच ना ?”
“होय. कंसा, ही तुझी लहान बहीण आहे. हिचं जीवन अजून उमलायचं आहे. बहरायचं आहे. अजून विवाहाची मंगल चिन्हंही हिच्या अंगावरुन उतरली गेली नाहीत. म्हणून तू हिला मारु नकोस.”
वसुदेवाने वेगवेगळ्या प्रकाराने कंसाची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला. अनेक हिताच्या गोष्‍टी सांगितल्या; पण त्या दुष्‍ट कंसाची काही केल्या समजूत पटेना. ते पाहून वसुदेवाने मनात विचार केला, ’कोणत्याही उपायाने का होईना हा प्रसंग टाळलाच पाहिजे. या मंगल क्षणी विपरीत घडता कामा नये. त्यासाठी आपली मुलं याच्या स्वाधीन करण्याचे वचन दिले तर ?’
वसुदेवाने मनाशी विचार पक्का केला. आणि तो कंसाला पुन्हा म्हणाला, “हे कंसा, तुला देवकीपासून तर कोणत्याही प्रकारचं भय नाही ना ? आकाशवाणीनेही तसं काही सांगितलं नाही ना ?”
“नाही.”
“तुला भीती आहे ती तिच्या मुलांची. तिचा आठवा मुलगा तुला मारणार.”
“होय.”
“मग मी तिची मुलं तुझ्या स्वाधीन करण्याचं वचन देतो. मग तर झालं ?”
कंसही विचार करु लागला. वसुदेव आपलं वचन कधीच खोटं करणार नाही, याची त्याला खात्री होती. शिवाय त्याला भय होते ते देवकीच्या आठव्या मुलापासून–देवकीपासून नाही ! त्याला वसुदेवाचा विचार पडला. त्याने देवकीला सोडून दिले. दोघेही आपल्या महाली गेले. पण मंगल प्रसंगावर पडलेले कृष्णछायेचे झाकोळून गेले. दिवस उलटू लागले. योग्य समयी देवकीला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे त्याला कंसाच्या स्वाधीन करणे भाग होते. वसुदेव देवकीजवळ आले. त्यांचा गळा दाटून आला. कोणत्या शब्दांत देवकीची समजूत घालावी त्यांना समजेना. अखेर मोठया कष्‍टाने ते म्हणाले, “देवकी ! ठरल्याप्रमाणे…”
“आपलं बाळ त्या दुष्‍टाला द्यायला पाहिजे.”
“होय. आपला शब्द…”
“नाही, नाथ ! आपलं पहिलंवहिलं बाळ…नाही, त्या दुष्‍टाला देणार नाही.”
देवकीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने बाळाला हृदयाशी घट्ट धरले. वसुदेव देवकीची समजूत घालत होते, “देवकी, अगं, वेडयासारखं करु नकोस. भगवंताला जर कंसाला मारायचंच असेल तर तो सारी व्यवस्था करणार नाही का ? त्याची लीला अतर्क्य आहे. त्यावर विश्‍वास ठेव.”
“पण माझ्या आठव्या बाळापासून त्याला भय आहे. यानं त्याचं काय केलंय ?”
“खरं आहे. हे जर कंसाच्या लक्षात आलं तर तो आपलं बाळ परतही देईल. दे बाळाला…”
बराच वेळ समजूत घातल्यानंतर, देवकीने त्याला पुन्हा पुन्हा हृदयाशी धरले. भावावेगाने त्याची कितीतरी चुंबने घेतली. आणि अश्रूंच्या अभिषेकातच तिने त्याला वसुदेवाच्या हातांत दिले. देवकीच्या उचंबळून आलेल्या वात्सल्याने वसुदेवांचेही डोळे पाणावले. त्यांनी बाळाला अलगद हाती घेतले. प्रेमभराने त्याचे चुंबन घेतले. त्याला छातीशी घट्ट धरले. आपल्या अश्रूंना डोळ्यांतच रोधले आणि शिसं भरल्या पायांनी ते देवकीच्या महालातून बाहेर पडले. बाळासाठी रडून रडून जिची चर्या कोमेजून गेली आहे, म्लान झाली आहे, अशी देवकी किती तरी वेळ वसुदेवाच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे बघत उभी होती.वसुदेव दृष्टिआड होताच तिला शोक आवरेना. तिने आपले अंग मंचकावर झोकून दिले. डोळ्यांतील आसवांनी शय्या भिजून गेली. तिचे मन अंधारुन गेले होते. जीवन शून्यवत वाटत होते. अशा स्थितीत ती किती वेळ होती हे तिलाही कळले नव्हते. ती भानावर आली, ती वसुदेवांच्या हर्षभरित, प्रेमळ हाकेमुळे.
“देवकी…देवकी…” अशा हाका मारत हर्षातिरेकाने वेडावलेल्या स्थितीतच वसुदेव महालात आले. त्यांच्या हातांत त्यांचा तान्हुला होता. ते पाहताच देवकी वार्‍यासारखी पुढे झेपावली. त्यांच्या हातातून बाळाला घेत, त्याला छातीशी कवटाळीत, त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करीत ती म्हणाली, “बाळाला परत दिलं त्यानं—आता हे आपल्याजवळच राहणार ना ? आता परत नाही ना नेणार माझ्या बाळाला ?”
“देवकी, त्याने बाळाला घेऊन जा असं सांगितलं.”
“काय म्हणाला तुम्हाला ?”
मी गेलो. बाळाला दाखवलं. मी आल्याच्म पाहून त्याला बरं वाटलं होतं. तो म्हणालाही, ’तू तुझे शब्द विसरणार नाहीस याची खात्री होती मला. म्हणूनच त्या दिवशी तुम्हाला सोडलं.’ मग बाळाला पाहून तो पुढे म्हणाला, ’वसुदेवा, या नाजुक, कोवळ्या मुलाला घेऊन जा परत. यापासून मला भय नाही. आकाशवाणीनं सांगितलं होतं, देवकीच्या आठव्या मुलापासून मला भीती आहे.’ त्याने असे सांगताच मी बाळाला घेऊन आलो.”
“देव पावला—आता माझं सोनुलं माझ्याजवळ राहणार—-”
“देवकी—”
“आता काय ?”
“तुला माहीत आहे, कंस दुष्‍ट आहे. चंचल वृत्तीचा आहे. त्याचं मन त्यच्या मुळीच स्वाधीन नाही, तो केव्हा बदलेल सांगता येत नाही.
तेव्हा—”
“नका, नाथ—असं काही बोलू नका. अशा बोलण्याने माझ्या मनाला किती यातना होतात म्हणून सांगू—हृदय कोणीतरी करवतीनं कापतंय, असं वाटतं. या शुभ्र घडीला तरी असं अशुभ—”
“देवकी—-मला काहीच वाटत नाही का ? पण कंस कसा आहे हे तुलाही माहीत आहे. म्हणून सांगितलं इतकंच—
काही काळ गेला नाही तोच कंसाचा दूत आला. त्याला पाहताच वसुदेव-देवकीच्या मनात धस्स झाले.’आता हा कशाला आला? आणखी कोणतं संकट आता वाढून ठेवलं आहे ?’ असा विचार मनात येत असतानाच तो वसुदेवाला म्हणाला, “आपल्या दोघांना कंसमहाराजांनी बोलावलं आहे. आपल्या मुलाला घेऊन यायला सांगितलं आहे.”
दूत निघून गेला. देवकीनं विचारलं,”आता पुन्हा कशाला बोलावलं असेल हो त्यानं ?”
“मी तरी काय सांगू—? पण मी म्हटलं नव्हतं तो चंचल आहे. केव्हा बदलेल सांगता येत नाही.”
त्यांनी आपल्या बाळाला घेतले. दोघेही कंसाच्या महालात पोहचले. त्यांना पाहताच कंस संतापाने लालबुंद झाला. झालेला बदल वसुदेवाच्या लक्षात आला. काही वेळापूर्वी शांत, आनंदी असलेल्या कंसाला एवढं संतापायला काय झालं त्यांना कळेना. त्यांना विचार करायला वेळ मिळायच्या आतच कंस कडाडला,”देवकी—-आण ते कार्टं इकडं—”
“अरे पण दादा ऽऽ”
“माझ्या डोळ्यांत धूळ फेकता होय ?”
“काही तरी अपसमज होतोय—आम्ही काहीच केलं नाही; उलट आपण सांगितल्यावरुनच बाळाला मी परत नेलं.” वसुदेव काकुळतीला येऊन त्याला समजावू लागले.
“चूक तुमची नाही, मलाच कळलं नाही. नारदांनी डोळे उघडले नसते तर—तर मी भ्रमातच राहिलो असतो.”
“नारद आले होते इथं—काय सांगितलं त्यांनी ?”
“त्यांनी काय सांगितलं ? माझं हित आणि तुमची कारस्थानं.”
“आमची कारस्थानं ?”
“होय. तुमची कारस्थानं ! गोकुळात राहणारे नंद, गोप, गोपी, तू, ही देवकी सगळे देवतांचे अवतार आहेत, आम्हाला मारण्यासाठी सगळ्यांनी अवतार घेतलेत म्हणे ! पृथ्वीवर पापं वाढलीत. त्यांचा नाश करायचा आहे. आणि या देवकीच्या पोटी तो विष्णू अवतार घेऊन मला मारणार आहे.”
“पण महाराज, तिच्या आठव्या मुलापासून—-”
“गप्प बस—-म्हणे आठवा मुलगा ! नारद म्हणाले, तो विष्णू कपटी आहे. आठवा कुणापासून मोजणार ? आठव्या मुलापासून उलटया क्रमाने मोजले तर पहिला मुलगाही आठवा होऊ शकतो. आता माझे डोळे उघडले. आण—आण तो मुलगा इकडे.”
कंसाचे डोळे लाल झाले होते. त्याच्या उग्र चेहर्‍याकडे पाहवत नव्हते. त्याचा तो अवतार पाहून देवकी घाबरली. जोराच्या वार्‍याने केळ जशी थरथरावी तशी ती थरथरु लागली. तिने आपलय तान्हुल्याला छातीशी घट्ट धरले. वसुदेवालाही काय करावे काही कळेना. तो गोठून गेल्यासारखा उभा राहिला. कंसाने पुढे पाऊल टाकले. देवकी मागे सरली. तो पुढे आला. त्याने त्या बाळाला हात घातला. देवकीचा प्रतिकार लटका पडला. वसुदेवाने त्याला अडवण्याचा प्रयत्‍न केला पण कंसाने त्याला असा एक तडाखा दिला की, तो खाली कोसळला. त्याने देवकीच्या हातातलं मूल हिसकावून घेतलं. देवकी अक्रोश करु लागली. त्याकडे दुर्लक्ष करुन कंस नशेतच उद्‌गारला,”विष्णू तुझ्या पोटी येणार अन् मला मारणार काय ? थांब, तुलाच मी मारतो.”
त्या दुष्‍टाने त्या बाळाचा एक पाय आपल्या आडदांड हातात धरला, त्याला गरगर फिरवले आणि धाड्‌कन खाली आपटले. रक्‍ताच्या चिळकांडया उडाल्या. कंसाचे हात बाळाच्या रक्‍ताने रंगले.
आणि ते भयंकर दृश्‍य पाहून वसुदेव-देवकी बेशुद्ध पडले.
बर्‍याच वेळाने देवकी शुद्धीवर आली ती “बाळ…कुठेस तू ? कंसा ऽऽ—- दुष्‍टा, मारु नकोस रे त्याला—-सोड—-सोड—त्याला–सोड.” असं काहीतरी बरळतच ! तिने हात हलविण्याचा प्रयत्‍न केला. हातांत बेडया होत्या. तिने भोवताली पाहिले. वसुदेव खाली मान घालून तिच्याजवळ बसले होते. त्यांच्याही हातांत बेडया होत्या. ते दोघेही तुरुंगात होते. बाहेर कंसाच्या क्रूर रक्षकांचा पहारा होता. काळ पुढे सरकत होता. दोघेही बंदिखान्यातल्या जीवनाला सरावले होते. अजूनही देवकीचे दुःख कमी होत नव्हते. वसुदेव समजूत घालीत होते–”परमेश्‍वरावर विश्‍वास ठेव. तो सारं व्यवस्थित करील. कंसाला मारण्यासाठी भगवान आपल्याच उदरी येणार असतील, तर ते आपल्या सामर्थ्याने या सार्‍या शृंखला तोडून टाकतील. तू चिंता करु नकोस.”
वसुदेवांच्या स्निग्ध शब्दांनी तिला धीर यायचा. दुःख थोडे हलके व्हायचे. काळ हेच दुःखावर औषध असते. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली, आणि देवकीला दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. ती पुन्हा मोहरली; पण क्षणभरच ! सुख आणि दुःख हातात हात घालून त्या बंदिखान्यात वावरु लागले. दुसर्‍या बाळालाही कंसाने ठार केले. देवकीचा आक्रोश ऐकला फक्‍त तुरुंगाच्या दगडी भिंतींनी ! असे एक-दोन वेळा नाही, सहा वेळा घडले. कंसाने देवकीची सहा बाळे, तिच्याकडून हिसकवून घेऊन ठार मारली. जणू तिच्या हृदयाचे सहा वेळा लचके तोडले–क्रूरपणे ! निर्दयपणे !!
सातव्या वेळी देवकी गर्भवती झाली आणि तिचे तेज अधिक देदीप्यमान दिसू लागले. पण काय होतंय ते देवकीला कळलंच नाही नि तो गर्भ पोटातून अचानक नाहीसा झाला. देवकीला आता या यातना सहन होत नव्हत्या. ती भगवंताची प्रार्थना करत होती,
“देवा नारायणा, आता तू अवतार घे आणि या कंसाला, दुष्‍टाला मारुन टाक. आता मला हे दुःख सहन होत नाही रे ! माझ्या तान्ह्या बाळांनी कंसाचं काय वाईट केलं होतं ? डोळ्यांदेखत त्यांचा मृत्यू बघणं कोणत्या मातेला सहन होईल ? देवा, त्या दुःखाची कल्पना करायला माताच बनलं पाहिजे…तू आता लवकर ये आणि या दुष्‍टाला योग्य शिक्षा कर. आता धीर धरवत नाही.”
देवकीची प्रार्थना देवाने ऐकली. देवकी आठव्यांदा गर्भवती झाली. या वेळी तिच्या मनाला विलक्षण प्रसन्नता वाटत होती. तिचे तेज आगळेवेगळे दिसत होते. जणू शतकोटी सूर्य-चंद्र तिच्या मुखावर झळाळत आहेत. दिवस जात होते. श्रावण वद्य अष्‍टमीला देवकीने एका सुरेख बाळाला जन्म दिला. थोडयाच वेळात वसुदेव-देवकीला भगवंताने आपले चतुर्भुज रुप दाखविले. पुढचा मार्ग सांगितला. थोडयाच वेळात वसुदेव त्या बालाकाला घेऊन गोकुळात गेले. नंदपत्‍नी यशोदाही त्याच वेळी प्रसूत झाली होती. तिला मुलगी झाली होती. वसुदेवाने अपत्यांची अदलाबदल केली. पुन्हा बंदिशाळेत आले. कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता कळताच तो रागारागाने आला. ती कन्या हिसकावून घेतली आणि गरागरा फिरवून शिळेवर आपटणार तोच ती हातून निसटली आणि कंसाला म्हणाली,”दुष्‍टा, मी योगमाया तुझ्या हाती थोडीच सापडणार ? तुझा शत्रू अन्यत्र वाढतो आहे. तो तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही.”
कंसाचा चेहरा उतरला. कृष्णाच्या नाशासाठी त्याने खूप प्रय‍त्‍न केले, पण उपयोग झाला नाही. कृष्णानेच कंसाला मारले. नंतर तो गुरुगृही गेला, विद्यासंपन्न झाला, आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना त्यांचा मृतपुत्र आणून दिला. देवकीच्या डोळ्यांसमोरुन या सगळ्या घटनांचा चित्रपट सरकला. तिचा विचार अजूनही चालू होता. आता तिला कृष्णभेटीची उत्सुकता लागली होती. ती त्याची चातकासारखी वाट पाहत होती.एक दिवस सकाळीच कृष्ण-बलराम देवकीच्या महाली आले. त्यांनी मातेला वंदन केले. आशीर्वाद देऊन तिने कृष्णाला आपल्या एका बाजूला आणि  बलरामाला एका बाजूला बसवले. देवकीच्या मनातून आपल्या मृतपुत्रांची स्मृती जात नव्हती. तिने कृष्णाकडे बघत हाक मारली, “कृष्णा–मी असं ऐकलं आहे की.”
“काय, आई ?”
“गुरुगृही तू विद्या संपादन केलीस आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना तू त्यांचा मृतपुत्र परत आणून दिलास.”
“खरं आहे. त्यांनी आणि गुरुपत्‍नीने आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. आम्ही इकडे आल्यावर त्यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण होणार होती. त्यांनी सूचित केलं, ’माझा पुत्र असता तर-तर तो कायम माझ्याजवळ राहिला असता. पण आज तो…’ हे शब्द म्हणत असताना ते गहिवरले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांची ती भावाकुल स्थिती माझ्याच्याने पाहवेना. म्हणून मी गुरुदक्षिणा म्हणून…”
देवकीचे डोळेही पाणावले. तिचा प्रेमळ हात कृष्णाच्या पाठीवरुन फिरत होता. तो स्पर्श वेगळा होता. बोलका होता. त्याने आईच्या मुखाकडे पाहिले नि तो म्हणाला, “तुझ्या डोळ्यांत पाणी ?”
“बाळा, तुझ्या गुरुजींचं-गुरुपत्‍नीचं दुःख हृदयाला भिडलं….”
“आईऽऽ !”
“हो. कृष्णा…आपला एक पुत्र जरी काळाने हिरावून नेला असला तरी मातेला किती दुःख होतं, त्याचा अनुभव मी घेतला आहे. पण मी…मी आणखी दुर्दैवी….”
“आई, असं का म्हणतेस ? बलदादा, मी-आम्ही दोघं समर्थ असताना तू स्वतःला दुर्दैवी का म्हणतेस ?”
“तसं नाही रे…तुमच्यासारखी गुणी मुलं, सामर्थ्यसंपन्न मुलं लाभायला भाग्यच लागतं. मी भाग्यवती आहे कृष्णा, पण…”
“पण काय, आई ?”
“मला माझ्या गतपुत्रांची स्मृती अस्वस्थ करते आहे. ती सहा बाळं माझ्या डोळ्यांसमोर येतात. वाटतं, त्यांना भेटावं. त्यांना आंजारावं-गोंजारावं ! त्यांना मांडीवर खेळवावं. कृष्णा, वेडी म्हणशील मला. पण मातृप्रेम वेडंच असतं रे ! वाटतं, त्यांना स्तनपान करावं. कृष्णा…”
“बोल, आई.”
“कृष्णा, माझ्या इच्छेसाठी….माझ्यासाठी त्या बाळांना आणशील परत ? त्यांना एकदा डोळे भरुन पाहावंसं वाटतं रे…”
कृष्णाने देवकीच्या मुखाकडे पाहिले. त्या बालकांना भेटण्याची आतुरता, त्यांच्या वियोगाचं दुःख, कारुण्य अशा कितीतरी भावना तिच्या मुखावर दाटल्या होत्या. तो म्हणाला, “आई, एवढंच ना ! त्यासाठी एवढं दीन व्हायचं काय कारण ? जे मी माझ्या गुरुसाठी केलं ते मी माझ्या मातेसाठी करु शकणार नाही का ? मातेची इच्छा पूर्ण करणं हे कर्तव्य आहे माझं. आई, तू काळजी करु नकोस. मी तुझी साही मुलं तुला भेटवितो.”
“खरंच…कृष्णा…खरंच भेटतील ती मला ?”
“होय, आई. तू निश्‍चिंत रहा.
कृष्णाच्या बोलण्याने तिचा चेहरा उजळला. तिच्या मुखावर आनंद मावेनासा झाला. कृष्ण, बलराम दोघांनीही देवकीला नमस्कार केला. प्रेमळ शब्दांनी आणि भरल्या हृदयाने तिने आशीर्वाद दिला. ते दोघे महालाबाहेर पडले. तिचे मन स्वप्‍न-विभोर बनले. मनाला असंख्य मोरपिसं फुटली. तिच्या रोमारोमात आनंद भरुन राहिला होता.
कृष्ण आणि बलराम यांनी योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. दैत्यराज बलीचे तेथे राज्य होते. त्याने रामकृष्णांना आलेले पाहताच त्यांचे स्वागत केले. त्यांना वंदन करुन उत्तम प्रकारच्या आसनावर बसविले, त्यांचे यथाविधी पूजन केले. त्यांना बहुमूल्य वस्‍त्राभूषणे दिली. त्या आदरातिथ्याने संतुष्‍ट होऊन कृष्णाने बलीला त्याचे क्षेमकुशल विचारले. काही वेळाने बलीने विचारले, “देवाधिदेवा. आज पाताललोकी येणं का केलंत ? आपलं कोणतं प्रिय मी करावं ?”
“दैत्यराज, तुझं औदार्य अखिल विश्‍वाला माहीत आहे. तू उदार आहेस म्हणून मी पुन्हा दान मागायला आलो आहे.”
“आता मी आपल्याला काय देणार ? माझ्याकडे आता काही देण्यासारखं….”
“आहे. म्हणूनच आलो आहे.”
“सांगावं आपण. मी जरुर देईन. अतिथीला तृप्‍त करुन, भरल्या मनानं पाठविण्यात आनंद असतो.”"दैत्यराज, माझ्या मातेची सहा मुलं, ती जन्मल्याबरोबरच कंसाने ठार मारली होती. त्या मुलांसाठी माझी माता अत्यंत शोकाकुल झाली आहे आणि ति मुलं तुझ्याजवळ आहेत. माझ्या मातेचा शोक दूर करण्यासाठी ती माझी भावांडे मला हवी आहेत. ती तू मला दे.”
श्रीकृष्णाचे बोलणे ऐकताच बलीने ती छोटी बालके कृष्णाच्या स्वाधीन केली. कृष्ण-बलराम त्या मुलांसह द्वारकेला परत आले. देवकी त्यांची वाट पाहत होती. कृष्ण-बलरामाला तान्हुल्या मुलांना घेऊन आलेले पाहताच ती देहभान विसरली. तिचा आनंद गगनात मावेना. कृष्ण महालात आला. त्याने ती मुले-त्याची भावंडे-आईच्या स्वाधीन केली. त्या मुलांना घेताच देवकीचे वात्सल्य उचंबळून आले. ती पुन्हा पुन्हा त्या मुलांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागली. त्यांना मांडीवर घेऊन थापटू लागली. त्यांची पुन्हा पुन्हा चुंबने घेऊ लागली. त्यांची मस्तके हुंगू लागली. तिच्या स्तनांतून दूध येऊ लागले. तिने त्या मुलांना पदराखाली घेतले. त्यांना स्तनपान करविले. त्या मुलांच्या स्पर्शाने ती जणू सुखसमुद्रात पोहत होती. सुखामृतात भिजून चिंबचिंब झाली होती. त्या बालकांशिवाय तिला अन्य काहीही दिसत नव्हते. जाणवत नव्हते. ती आणि मुले दोन्ही एकरुप झाले होते. कृष्ण तिच्या जवळ उभा होता. आईच्या वात्सल्यमूर्तीचा तो नव्याने पुन्हा अनुभव घेत होता. त्याच्या मनातही मातृप्रेमाच्या लहरी उचंबळल्या. देवकीच्या त्या भावसमाधीचा भंग करीत तो म्हणाला, “आई ऽऽ”
“हं…”
“आई ऽऽ…या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे. शेंडेफळ आहे तुझं…”
त्या शब्दांनी देवकी भारावून गेली. त्या बछडयांना थोडंसं बाजूला करीत तिने आपले हात पसरले. जणू वात्सल्याला अंकुर फुटले. कृष्णही पुढे गेला. मोठया प्रेमाने तिने त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याच्या मुखावरुन पुन्हा पुन्हा आपला हात फिरवला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. कृष्णाला ती त्यांनी न्हाऊ घालत होती. आणि वात्सल्याच्या त्या अपूर्व संगमाने कृष्णाच्या नेत्रांतूनही अश्रू झरत होते.

यशोदा


यशोदा

जीवनाच्या संध्याकाळी यशोदा पुत्रवती झाली. कृष्णजन्म झाला. यशोदेच्या आणि नंदाच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. सारे गोकुळच आनंदात निमग्न झाले. यशोदेला तर कृष्ण जीव की प्राण वाटू लागला. क्षणभरही ती त्याला दृष्‍टिआड होऊ देईना. तिच्या वात्सल्याच्या वर्षावाने कृष्णही गुदमरुन जात होता. वात्सल्यरसात न्हाऊन निघत होता. 

कृष्ण गोकुळात वाढतो आहे, याचा सुगावा कंसाला लागला. त्याचा नाश करण्यासाठी कंसाचे प्रय‍त्‍न सुरु झाले; आणि अगदी महिन्याच्या आतच कृष्णावर संकटांची परंपरा कोसळू लागली. संकटे कसली, यशोदेच्या वात्सल्यप्रेमाची ती परीक्षाच होती. कसोटी होती. त्या संकटातूनच कृष्णावरचे तिचे प्रेम वाढत होते. घनीभूत होत होते. कृष्ण तिचा बहिश्‍चर प्राण बनला होता. रात्रंदिवस तिला कृष्णाशिवाय काही सुचत नव्हते.
कंसाने पूतनेला कृष्णाकडे पाठविले. सांगितले, ’वात्सल्याचा आव आणायचा. त्याला स्तनपानाला जवळ घ्यायचं. आणि विषलिप्‍त स्तनपानाने त्याचा नाश करायचा.’ पूतनेने गोपसुंदरीचा वेष घेतला. ती लावण्यवती नंदाघरी आली. यशोदेकडून कृष्णाला घेतले. त्याला स्तनपान करु लागली. कृष्णाला कल्पना आली. तो विषमिश्रित दुधाबरोबर तिचे पंचप्राणच ओढून घेऊ लागला. तिने प्रयत्‍न केला पण कृष्ण स्तन सोडीना. ती घाबरी झाली, अन् कृष्णाला घेऊनच मथुरेच्या दिशेला पळत सुटली. ते पाहून यशोदा घाबरी झाली. तिला काही सुचेना. रडू लागली. भोवताली असणार्‍या गोपस्‍त्रिया पूतनेपाठोपाठ पळू लागल्या. पूतना जीवाच्या आकांताने पळत होती. कृष्ण तिचे प्राण ओढून घेतच होता. अखेर ती धाडकन पडली. मरताना तिचा आक्राळविक्राळ देह जमिनीवर पडला. कृष्ण तिच्या अंगावर होता. गोपस्‍त्रिया घाबरल्या. तशाच पुढे गेल्या. कृष्णाला कडेवर घेतले आणि तशाच धावत यशोदेकडे आल्या. तोपर्यंत यशोदेच्या जीवात जीव नव्हता. जणू तिचे प्राणच पूतनेच्या पाठोपाठ जात होते. तिच्या डोळ्यांतले अश्रू अखंड वाहत होते. गोपींनी जेव्हा त्याला यशोदेच्या हाती दिले तेव्हा तिने कृष्णाला अश्रूंनी भिजवून काढले. छातीशी घट्ट धरुन ठेवले. प्रेमभराने त्याची लाखलाख चुंबने घेतली. त्याला दृष्‍ट लागली असेल म्हणून त्याची दृष्‍ट काढली. त्याला गोठयात नेले. एका शुभलक्षणी गायीच्या शेपटाचा गोंडा त्याच्या सर्वांगावर फिरवून त्याचे मंगल व्हावे, अरिष्‍ट टळावे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली. तेव्हा कुठे तिचे मन थोडेसे स्वस्थ झाले. शांत झाले.
कृष्ण दिसामासांनी मोठा होत होता आणि यशोदेचा आनंदही क्षणाक्षणाने वाढत होता. कृष्णाला पाहून तिला आनंदाचे भरते येई. त्याच आनंदात दिवस कधी निघून जाई हे कळतही नसे. कधी मांडीवर घेऊन त्याच्या मुखाकडे टक लावून पाहावे. एखादी गोपी आली की, तिला म्हणावं, बघ ना किती गोड दिसतोय हा !’ कधी त्याला खांद्यावर घेऊन गाणं म्हणत हिंडवावं. कधी पाळण्यात घालून झोका द्यावा अन् त्याने हसत हसत हात उंचावले की, पटकन छातीशी घेऊन त्याचे चुंबन घ्यावे. सारा दिवस नि रात्र तिला कृष्णाचाच ध्यास लागलेला असे.
असाच एक दिवस. अंगणात एक मोठी गाडी उभी केलेली होती. त्याच्या खाली पाळणा बांधलेला होता. यशोदेने त्याला पाळण्यात झोपवले आणि ती घरात कामाला निघून गेली. त्याच वेळी कंसाकडून उत्कच नावाचा दैत्य आला. त्याने कृष्णाला पाहिले. तो गाढ झोपला होता. त्या दैत्याने त्या गाडीत प्रवेश केला. विचार केला, ’ही गाडी पाळण्यावर ढकलून द्यावी. त्याखाली कृष्ण आपोआप चिरडला जाईल आणि आपलं काम, कोणाच्याही लक्षात न येता पुरं होईल.’ तो संधीची वाट पाहत होता.
कृष्णाला त्याच्या काव्याची कल्पना आली. त्या दैत्याने पाळण्यावर गाडी ढकलण्याआधीच, कृष्णाने पाळण्यातून पाय बाहेर काढला आणि विरुद्ध दिशेने गाडी जोरात ढकलली. दाणकन ती खाली पडली. दैत्याचाच नाश झाला. गाडी पडल्याचा भयंकर आवाज यशोदेने ऐकला मात्र अन् ती कमालीची घाबरली. हातातले पात्र खाली पडले. ’त्या गाडीखाली कृष्ण जिवंत राहिला असेल का ?’ असा विचार येऊन ती जोरात किंचाळली. अंगणाकडे धावत सुटली आणि क्षणार्धात तो ताण असह्य होऊन खाली पडली. मूर्च्छित झाली. गोपी जमा झाल्या. त्यांनी तिच्या मुखावर पाणी शिंपडले. सावध होण्यासाठी उपचार केले. थोडया वेळाने ती सावध झाली. डोळे उघडले. एका गोपीच्या खांद्यावर कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली.
कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली. कृष्णाला तिच्याकडून घेतले. छातीशी कवटाळले. दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. रडता रडता आपलाच धिक्कार करीत म्हणू म्हणाली, “हाय ! माझं हे पाडस लोण्याहूनही सुकोमल…त्याला मी गाडीखाली झोपवलं…ती गाडी उलट दिशेला पडून तिचे तुकडे तुकडे झाले. तीच माझ्या बाळाच्या अंगावर पडली असती तर ? एवढा विचारही माझ्या मनात आला नाही ? हे भयंकर दृश्य पाहून अजून माझे प्राण मला सोडून गेले नाहीत ? त्यांना सांभाळत अजून मी जिवंत आहे…खरंच माझं अंतःकरण वज्रापेक्षाही कठोर आहे. मी केवळ नावाची माता आहे. माझ्या मातृत्वाचा, वात्सल्याचा धिक्कार असो…”
तिचा विलाप ऐकून गोपींनी तिची कितीतरी वेळ समजूत घातली. बर्‍याच वेळाने यशोदेने कृष्णाला घेतले आणि हृदयाशी धरुन ती त्याला आत घेऊन गेली.यशोदा मनात विचार करीत असे, ’माझा कृष्ण मोठा कधी होणार ? तो रांगायला केव्हा लागेल ? त्याला दात कधी येतील ? तो बोबडा बोलून माझ्या कानांना तृप्‍त केव्हा करेल ?’या विचारात ती देहभान विसरायची. देवालाही हीच प्रार्थना करायची. आणि थोडयाच दिवसांत यशोदेचे मनोरथ परिपूर्ण झाले. कृष्ण घरभर रांगायला लागला. अंगणात जायला लागला. आपलं अंग धुळीने माखून घेऊ लागला. त्याच्या पाठीमागे फिरण्यात यशोदा मेटाकुटीला येऊ लागली. ती त्याच्या भोवती भोवती फिरु लागली. जणू आत्माच परमात्म्याभोवती फिरतो आहे. लटक्या रागाने ती त्याला बोलू लागली. थोडयाच दिवसांत त्याला दुधाचे दात आले. लालचुटुक जिवणीत पांढरे शुभ्र दात शोभून दिसू लागले. जणू माणकांच्यामध्ये मोती बसवले आहेत. कृष्ण हळूहळू बोलूही लागला. त्याच्या बोबडया बोलांनी यशोदा अमृतात न्हाली. सारे घरदार बोबडे झाले.कृष्ण अंगणात रांगत होता. यशोदा त्याच्यावर लक्ष देत होती. एवढयात वार्‍याची झुळुक आली. वार्‍याचा वेग वाढला. धूळ उडू लागली. कृष्णाला घेण्यासाठी ती पुढे आली तोच कृष्ण आकाशात उंच उडाला. ती पाहतच राहिली. क्षणभरात गडगडाटी हास्याचा आवाज आला. तो तृणावर्त राक्षस होता. ते विकट हास्य ऐकून यशोदेने किंकाळी फोडली. ’कृष्णा‍ऽऽ…’ म्हणून जोराने हाक मारली आणि ती धाडकन खाली कोसळली. आता यशोदा जिवंत राहणेच कठीण होते. गोपींनी सावध करण्याचा खूप प्रयत्‍न केला. नंदालाही बोलावून आणले. तिची हालचाल थांबली होती. श्‍वास अगदीच मंद झाला होता. सगळ्यांच्या पुढेच ’काय करावं ?’ हा प्रश्‍न पडला होता. उपचार चालू होते. इतक्यात दूर अंतरावर काही तरी मोठी वस्तू पडल्याचा आवाज झाला. काहींनी जाऊन पाहिले. तो राक्षसाचा छिन्नविछिन्न देह होता; आणि त्यावर कृष्ण शांतपणे बसला होता. गोपींनी त्याला उचलले. यशोदेपाशी आणले. तिला हलवत एक गोपी म्हणाली, “यशोदे ऽऽ यशोदे…अगं, पहातरी कोण आलंय. अगं, डोळे उघड ना…कृष्ण आलाय. खरंच, हा बघ कृष्ण…घे त्याला….”
ते शब्द तिच्या कानांवर पडले. कृष्णाचे नाव तिच्या कानांवर पडताच कुणीतरी संजीवन मंत्र म्हणावा तशी ती जागी झाली. वर्षाऋतूचं पाणी पिऊन इंद्रगोप ज्याप्रमाणे सजीव होतात तशी ती सावध झाली. कृष्णाला समोर पाहताच झटकन उठून बसली. गोपींनी कृष्णाला तिच्याजवळ दिले. मग कितीतरी वेळ ती त्याला छातीशी कवटाळून बसली होती. त्याला अश्रूंचा अभिषेक करीत होती. वात्सल्याचे ते परम मंगल दृश्य गोपीही भारावलेल्या अंतःकरणाने पाहत होत्या. कृष्णाला पाहून यशोदेचे वात्सल्य उचंबळून यायचे. जणू त्या दोघांत पैज लागायची ! यशोदेचे वात्साल्य पाहून, त्याची छाया सायीसारखी दाट व्हावी म्हणून कृष्णाचे लीलामाधुर्य शतपटीने प्रकाशित व्हायचे आणि ते लीलामाधुर्य पाहून यशोदेच्या भावसिंधूवर सहस्‍त्रावधी तरंग निर्माण व्हायचे. यामुळेच यशोदेचे वात्सल्य अनन्त, असीम आणि अपार बनले होते. त्या वात्सल्यात निमग्‍न असणारी यशोदा सारं सारं विसरुन गेली होती. स्वतःलाही विसरली होती. तिचे नेत्र केवळ कृष्णाला पाहत होते. तिचे मन केवळ कृष्णाचाच विचार करीत होते. तिचे हृदय केवळ कृष्णप्रेमच जतन करीत होते. ती कृष्णमय होऊन
गेली होती. काळाचं अखंडत्व, कोणी सांगितले तर खंडित व्हायचे अन् दिवस-रात्र तिला कळायचं; नाहीतर अखंड काळ तिच्यासमोर कृष्णमय होऊनच वावरत होता.
एका सकाळी कृष्ण अंगणात गेला. खेळता खेळता त्याने मातीची बुचकुली भरली आणि तोंडात घातली. यशोदेने ते पाहिले. हातातले काम टाकून ती तशीच धावत बाहेर आली. तिने कृष्णाच्या पाठीत धपाटा घातला. त्याला रागावून म्हणाली, “माती खाल्लीस ? तोंड उघड पाहू.”
कृष्णाने मुकाटयाने तोंड उघडले. ती त्याच्या तोंडात माती कुठे ते पाहू लागली. आणि पाहता पाहता पाहतच राहिली. तिचे नेत्र विस्फारले गेले. ती चित्रासारखी स्थिर झाली. चेहर्‍यावर आश्‍चर्य दाटले. कृष्णाच्या मुखात सारे विश्‍व तिला दिसले. ते अतर्क्य दृश्य पाहून ती भयचकित झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कितीतरी वेळ ती त्याच स्थितीत होती. थोडया वेळाने कृष्णाने तोंड मिटले. कृष्णाने आपल्या मायेचे पटल पुन्हा यशोदेवर पसरले. ती हे सारं विसरुन गेली. तिने कृष्णाला कडेवर घेतले आणि ती त्याला घरात घेऊन गेली. यशोदा कृष्णलीलेत रंगून गेली होती तरी काळ आपले कर्तव्य विसरला नव्हता. तो आपल्या गतीने पुढे सरकत होता. कृष्णाला आता चांगलेच पाय फुटले होते. तो शेजारीपाजारी जाऊ लागला होता. स्वभावाने खोडकर.
गप्प बसणे माहीतच नाही. त्यामुळे गोपींच्या घरी जाऊन तो उचकाउचकी करु लागला. दह्यादुधाची भांडी सांडू लागला. फोडू लागला. लोणी खाऊन सगळं अंग बरबटून घेऊ लागला. आणि तक्रारी करुन गोपी यशोदेला भंडावून सोडू लागल्या. असा एकही दिवस जात नव्हता की, ज्या दिवशी कृष्णाची कोणतीही तक्रार आली नव्हती. कृष्णाच्या खोडया पाहून ती काही वेळा रागवायची. पण थोडयाच वेळात तो राग शांत व्हायचा अन् हृदयाकाशात वात्सल्याचा पूर्ण चंद्र आपल्या शीतल चंद्रिकेचा वर्षाव करायचा.
पण एक दिवस मात्र कृष्णाने कमालच केली. घरात दहयाचे एक भांडे पूर्वापार चालत आले होते. सहवासाने त्यासंबंधी यशोदेला प्रेम होते. कृष्ण खेळत खेळत आला. हातातली काठी त्याच्यावर मारली आणि एवढं मोठं सुंदर भांडं फोडून टाकलं. ते पाहून यशोदा रागावली. ’आता मात्र याला शिक्षा केलीच पाहिजे. अवखळपणा फारच वाढलाय.’
“रोज दह्याची भांडी फोडतोस. सगळ्याजणी तुझ्याबद्दल तक्रार करतात. थांब.तुला आता चांगली शिक्षा करते.”
तिला समोर उखळ दिसले. कृष्णाला तिने उखळापाशी नेले. त्याला धाक वाटावा म्हणून तिने त्या उखळाला त्याला घट्ट बांधून ठेवले. मग ती घरात निघून गेली.
कृष्णाने पाहिले, यशोदा आत गेली आहे. तिचे लक्ष नाही. त्या उखळापासून बर्‍याच दूर अंतरावर दोन अर्जुनवृक्ष अगदी जवळ जवळ उभे होते. कृष्ण उखळासह पुधे चालू लागला. त्या वृक्षांपाशी आला. उखळ त्या दोन वृक्षांच्यामध्ये अडकले. त्या वृक्षांना कृष्णस्पर्श होताच जोराचा आवाज झाला. ते दोन्ही वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. ते वृक्ष म्हणजे नलकबूर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराचे पुत्र होते. कृष्णाचा सहवास मिळताच त्यांना त्यांचे मूळ रुप मिळाले आणि ते आकाशमार्गाने जाऊ लागले. आवाज होताक्षणीच यशोदा घाबरुन बाहेर आली. तिचा लाडका कान्हा उखळासह खूप दूर गेला होता. यमलार्जुन वृक्ष खाली कोसळले होते. कृष्ण आनंदात उभा होता. यशोदेने कृष्णाला सोडले. त्याला हाताला धरुन ती आत आणू लागली पण येता येता त्याचे रक्षण कसे करावे, कंसाच्या वक्रदृष्‍टीतून त्याला कसे वाचवावे हाच विचार तिला अस्वस्थ करीत होता. केवळ यशोदाच नव्हे, तर सारेच व्रजवासी कृष्णाच्या सुरक्षिततेची काळजी करु लागले. आजपर्यंत पूतना, शकरासुर, तृणावर्त यांपासून परमेश्‍वरानेच त्याला वाचवले, असे सगळे समजत होते. पण आता या गोकुळात राहणे सर्वांनाच धोक्याचे वाटू लागले. त्या सगळ्यांनी ठरवले, आता गोकुळात राहायचे नाही. वृंदावनात जायचे. त्याप्रमाणे सारे वृंदावनात आले. यशोदा-कृष्णही गोकुळातून वृंदावनात आले.
वृंदावनात आल्यानंतरही कृष्णाच्या लीला सुरुच होत्या. कधी गोपबालक यशोदेला कृष्णाचे पराक्रम सांगत असत, तर कधी यशोदा स्वतःच ते पाहत असे. त्यामुळे कधी ती आनंदात बुडून जाई तर कधी या मुलाचं रक्षण कसं करायचं, या विचाराने तिचे प्राण व्याकुळ होत असत. कासावीस होत असत. आता कृष्ण मोठा झाला होता. सवंगडयांच्या बरोबर यमुनातीरी खेळायला जाऊ लागला होता. खेळताना तन्मय होऊ लागला होता. एकदा दुपारी यमुनातीरी विटीदांडूचा खेळ मांडला होता. खेळ रंगत आला. एकाने विटी मारली ती यमुनेच्या डोहात पडली. ती आणण्यासाठी कृष्ण धावत सुटला. कृष्णाला कल्पना नव्हती, पण तो डोह कालिया नागाचा होता. त्याने फूत्कारुन फूत्कारुन त्या डोहाचे पाणी विषारी करुन टाकले होते. कोणीही त्या पाण्याचा उपयोग करु शकत नव्हते. गायींना ते पाणी पिता येत नव्हते. कृष्णाच्या सवंगडयांना हे माहीत होते. त्यामुळेच कृष्ण विटी काढायला निघाल्याबरोबर ते ओरडू लागले, “कृष्णा ! थांब-त्या डोहाकडे जाऊ नकोस. त्या डोहात कालिया नाग आहे. यमुनामाईचं पाणी विषारी झालं आहे. तू जाऊ नकोस तिकडे- आपण दुसरी विटी करु–”
कृष्णाच्या कानांवर ते शब्द पोहचलेच नाहीत. तो तीरासारखा धावत गेला. आणि बाकीचे नको-नको म्हणत असताना त्याने त्या डोहात उडी मारली. लाटा उसळल्या अन् शांत झाल्या. आता कृष्ण परत येत नाही असा विचार करुन काही गोपबालक घराकडे धावत गेले. त्यांनी ही वार्ता सांगताच सारे लोक, गोपी यमुनाकाठी जमा झाल्या. यशोदेला तर काहीच सुचेना. ती धावतपळतच यमुनातीरी आली. कालियाच्या डोहातून कृष्ण आता परत येणार नाही याची सर्वांची खात्री पटली. पुढे जायला कोणीच तयार नव्हते. जाणे शक्यही नव्हते. ते सारं पाहून यशोदा रडू लागली. तिची समजूत तरी कोण घालणार अन् कशी ? कृष्ण सर्वांचा आवडता. सगळ्याच गोपी त्याच्यावर पुत्रवत प्रेम करायच्या. आणि आता कृष्णाच्या अनिष्‍ट कल्पनेनेच सार्‍यांना दुःख अनावर झाले. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू झरत होते आणि सारे गोप, कृष्णाचे सवंगडी हतबुद्ध होऊन, यमुनेच्या त्या डोहाकडे पाहत होते. सगळे हवालदील झाले होते. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. वेळाचे भान कोणालाच नव्हते. बर्‍याच वेळाने डोहातल्या लाटा पुन्हा हलल्या. आणि सूर्यबिंब क्षितिजावर हळूहळू वर यावे तसा कृष्ण कालियाच्या फण्यावर उभा राहून वर येऊ लागला. ते पाहताच गोपाळ ओरडले,”तो पहा, आला, कृष्ण आला-”
यशोदेने समोर पाहिले. कृष्ण आला होता. तिला सारंच अतर्क्य होतं. हसताना रडावं का रडताना हसावं हेच तिला कळेना. एवढयात कृष्णाने कालियाच्या फण्यावरुन तीरावर उडी मारली. पुन्हा धावत तो यशोदेकडे आला अन्‌ लडीवाळपणे म्हणाला, “आईऽऽ तू इथे कशाला आलीस ? अन् रडतेस कशाला ! विटी आणायला म्हणून मी डोहात उडी मारली. ही बघ विटी घेऊन वर आलो.”
या त्याच्या बोलण्यावर, त्याला काय बोलावे हेच तिला कळेना. तिने त्याला घट्ट मिठी मारली. गोपींनीही सुटकेचे निःश्‍वास टाकले. सगळ्यांनी त्याला अश्रूंनी भिजवले. त्या आनंदात ते घरी कधी परतले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. कृष्णाच्या लीला दिवसेंदिवस वाढतच होत्या. यशोदा घरी असली तरी तिचं लक्ष सारखं श्रीकृष्णाकडे असायचे. डोळे त्याला पाहायला आतुर असत, कान त्याचे बोल ऐकायला उत्सुक असत अन् हात त्याला उचलून घ्यायला अधीर झालेले असत. कंसाच्याही कानांवर कृष्णाचे स्थलांतर गेले होते. तोही अनेक असुरांना पाठवीत होताच. वत्सासुर, बकासुर, केशी असे कितीतरी जण कृष्णाला मारण्यासाठी आले; पण कृष्णापुढे त्यांचे काही चालले नाही. कृष्णाच्या या पराक्रमाचे गोपालांनी वर्णन केले की, यशोदा मोहरुन येई आणि त्याच वेळी त्याच्या रक्षणाच्या काळजीने भयाकूल होत असे. अशा अनेक प्रसंगी यशोदेच्या अंतःकर्णात हर्षाच्या, दुःखाच्या ज्या लहरी उचंबळून येत त्यांत ती स्वतःतर बुडून जात असेच, पण व्रजवासींनाही त्यांत बुडवून टाकत असे.
असाच एक दिवस. संध्याकाळ होत होती. मथुरेच्या रस्त्याने एक रथ भरधाव वेगाने वृंदावनात येत होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. रथ जवळ आला. अक्रूर त्यातून खाली उतरला. त्याने नंदाची गाठ घेतली. अक्रूर त्यांचा आप्‍तेष्‍टच होता. दोघांनीही एकमेकांना क्षेमकुशल विचारले. रात्रीची भोजने झाली. थोडी शांतता झाल्यावर नंदयशोदाने अक्रूराला विचारले, “आज वृंदावनात पायधूळ कशी झडली ?”
“कंस महाराजांचा निरोप घेऊन आलोय.”
कंसाचे नाव निघताच नंदाच्या कपाळाला आठी पडली. यशोदा तर संतापलीच. रागानेच तिने विचारले,”तो दुष्‍ट आता आणखी काय म्हणतोय ?”
“तसं काही विशेष नाही, त्याने मोठा यज्ञ करायचे ठरविले आहे. तो यज्ञाचा सोहळा बळराम, कृष्णानी पाहावा अशी त्यांची इच्छा आहे. यज्ञ संपला की मी परत घेऊन येईन त्यांना.”
“कृष्णाला मथुरेला पाठवायचं ?” यशोदा.
“हो—काही दिवस—”
अक्रुराचा निरोप ऐकताच आपल्या हृदयावर कोणीतरी वज्रपहार करतो आहे, असे तिला वाटले. ती अस्वस्थ झाली. ताडकन म्हणाली, “नाही. ते कदापि शक्य नाही. कृष्ण माझा जीव की प्राण आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकणार नाही.”
तिचे उत्तर ऐकून अक्रूर आणि नंद क्षणभर गप्प राहिले. नंतर अक्रूराने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्‍न केला, पण तिची समजूत पटेना. कृष्णाला एक क्षणभरही दृष्‍टीआड करायला ती तयार होईना. कंसाच्या सापळ्यात पाठवायला तिचे मन तयार होईना. अखेर कृष्णानेच आपल्या मायेचा प्रभाव यशोदावर पसरला. त्याला मथुरेला जायलाच हवे होते. त्याशिवाय कंसाचा समाचार घेता येणार नव्हता. मायेच्या प्रभावाने यशोदा संभ्रमात पडली. अजूनही ती अनुमती द्यायला तयार होत नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. अखेर नंदाने तिची खूप समजूत घालून तिला शांत केली. कृष्णाला आपल्या कुशीत घेऊन ती त्याला थोपटत होती. रात्रभर रडत होती. डोळ्याला डोळा लागला नव्हता. सकाळ झाली. जाण्याची वेळ झाली. यशोदेचे चित्त मुळीच ठिकाणावर नव्हते. तिला काही सुचत नव्हते. तिचे मन सैरभैर झाले होते. कृष्ण प्रवासाला निघाला होता, त्या वेळी योग्य ते मंगलचिंतनही ती करु शकली नाही. त्याच्याबरोबर प्रवासासाठी शिदोरी देण्याचेही ती विसरुन गेली. श्रीकृष्णाला हृदयाशी घेऊन ती सारखा विलाप करीत होती, अखेर बळंच कृष्णाला तिच्यापासून सोडवून रथावर बसवले. बलरामही आला आणि अक्रूराचा रथ मथुरेच्या मार्गावर दौडू लागला. कृष्णाला घेऊन रथ चालला होता. रथचक्रांच्या खुणा भूमीवर उमटत होत्या, जणू धरारुपी यशोदेचे छेदलेले हृदयच पृथ्वीदेवी व्यक्‍त करीत होती. कितीतरी वेळ ती जाणार्‍या रथाकडे पाहत होती. तिच्या शरीरातले चैतन्य नाहीसे झाले
होते. जणू प्राणपक्षीच उडून गेला होता. गलितमात्र होऊन ती घरात आली होती. खरं म्हणजे गोपींनी तिला आणली होती. तिला कृष्णाशिवाय काही सुचेना. ती वारंवार रस्त्यावर जाऊ लागली. ज्या रस्त्याने कृष्ण गेला, त्या रस्त्याकडे हात करुन दुःखातिरेकाने म्हणू लागली, “अरे, अक्रूर कृष्णाला घेऊन चालला आहे. त्याला थांबवा. त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. थांबवा त्याला आणि माझ्या कृष्णाला कुणीतरी परत आणा रे !”
तिची ही अवस्था पाहून गोपींना, नंदाला वाईट वाटे. दुःख होई. कृष्णालाही आपल्या मातेच्या दुःखाची कल्पना होती. मथुरेला गेल्यावर दुसर्‍याच दिवशी कृष्णाने उद्धवाला बोलावले आणि त्याला आपल्या मातेचे सांत्वन करायला पाठवले. तो यशोदेकडे आला. त्याने अनेक प्रकारे तिची समजूत घातली. पण उपयोग झाला नाही. यशोदेचे अश्रू तो पुसू शकला नाहि. तोही दुःखी मनाने परत कृष्णाकडे गेला. उद्धव येताच कृष्णाने मातेबद्दल चौकशी केली. त्याने यशोदेच्या दुःखाचे वर्णन करताच कृष्णाचेही डोळे भरुन आले. त्याचाही कंठ दाटून आला. सद्‌गदित स्वरात तो म्हणाला, “उद्धवा ! पाहिलंस यशोदेचं माझ्यावर किती प्रेम आहे ते ! वात्सल्यभावाने माझी भक्‍ती कशी करावी याचा श्रेष्‍ठतम आदर्शच यशोदेने घालून दिला आहे. उद्धवा, अशी माता मिळायला खरंच भाग्य लागतं.”
कृष्णाचा कंठ पुन्हा दाटून आला. डोळे पाझरु लागले. उद्धवाने यशोदेच्या कृष्णावरच्या प्रेमाचा नुकताच अनुभव घेतला होता. आता कृष्णाच्या मातृप्रेमाचा त्याला प्रत्यय येत होता. भक्‍तीच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन त्याला घडत होते. त्याच्याही अंतःकरणातल्या भक्‍तिवीणेच्या तारा छेडल्या जात होत्या. अन् यशोदेच्या त्या वत्सल मूर्तीपुढे त्याचे हात नकळतपणे जोडले जात होते, मस्तक नम्र झाले होते. 

कहाणी गणपतीची


कहाणी गणपतीची

ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पसापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबीं भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं घ्याईजे; मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी दिव्याच्या अंवसेची

कहाणी दिव्याच्या अंवसेची

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे
लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्षा पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी धरित्रीची


कहाणी धरित्रीची

ऐका परमेश्‍वरा धरित्रीमाये, तुझी कहाणी. आटपाट नगर होतं, नगरांत एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी ? धरित्रीमायेचं चिंतन करी. वंदन करी. धरित्रीमाये, तूंच थोर, तूंच समर्थ. काकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पांच पुत्र दे, दोघी कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. हा वसा कधीं घ्यावा ? आखाड्या दशमीस घ्यावा, कर्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतियेला घ्यावा, माघी तृतियेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईंचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं ? वाढाघरची सून जेवूं सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्रीमायेची साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संप्रूण (संपूर्ण).

कहाणी आदित्यराणूबाईची


कहाणी आदित्यराणूबाईची

ऐका आदित्यराणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानांत जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसतां ! तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाहीं, मातत नाहीं घेतला वसा टाकीत नाहीं. तेव्हां त्या म्हणाल्या श्रावणमास येईल. पहिल्या आदितवारीं मौनानं (मुकाट्यानं) उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या (नागवेलीच्या) पानांवर रक्त चंदनाची आदित्यराणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतु करावा, त्यास सहा गांठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप गूळ -खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सह मास चाळई, सहा मास चाळावी. माधीं रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं ? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर. लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरू द्यावी, नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करवं. अस वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली, तेव्हां राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावूं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिऊं लागला, कांपूं लागला, तेव्हां राजाचे राणीनं सांगितलं कीं भिऊं नका, कांपूं नका. तुमच्या मुली आमचे येथे द्या ! आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या ? दासी कराल, बटकी कराल ! राणी म्हणाली, दासी करीत नाहीं, बटकी करीत नाही. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं.
मार्गेश्वराचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरीं गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाही, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला कांहीं वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोंच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणूण बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या ! गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकूं, तर कोणाची ऐकूं ? घरांत गेली, उतरंडीचीं सहा मोत्येंआणलीं. तीन आपण घेतलीं, तीन बापाच्या हातांत दिलीं. त्यानं मनोभावें कहाणी सांगितली. लेकीणं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवूण खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे ? जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे ! इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितलं. मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कआ आला आहे ? काय आला आहे ? फाटकं नेसला आहे. तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे ! परसदारानं घेऊन या ! परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं-माखूं घातला, पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घाअलं, कोहोळा पोखरला, होनमोहोरा भाल्या. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून जा ! वाटेनं आपला जाऊं लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरीं गेला. विचारलं, काय रे बाबा मावशीनं काय दिलं ? दैवें दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, तें पण सर्व गेलं ! पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहीला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन माझा निरोप सांगा. त्यांनीं सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं-माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला, जेवूं-खाऊं घातला, काठी पोखरून होनमोहोरांनी भरून दिली. बाबा, कोठें ठेवूं नको, विसरूं नको, घरीं जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवें दिलें, तें सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाहि पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातला. नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. कोठें ठेवूं नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरीं जातांना विहिरीच्या कांठीं नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरींत उतरला, तों नारळ गडगडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं, ‘काय रे बाबा, मावशीनं काय दिलं ?’ आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाहि प्रधानाचे राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला जेवूं-खाऊं घातलं. त्याला दह्याची शिधोरी दिली होनमोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिधोरी घेऊन गेला. घरीं गेला, आईनें विचारलं, काय रे बाब, मावशीनं काय दिलं ? आई गं, मावशीनं दिलं पण दैवानं तें सर्व नेलं ! पांचवे आदितवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, न्हाऊं घातली, माखूं घातली. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करूं लागली. काय वसा करतेस तो मला सांग ! बहीण म्हणाली, अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करूं ? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणमास आला. सांगिप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्रं कोठली ? चामरं कोठली ? पाईक कोठले ? बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणी-बहिणींनी आहेर केले. वाटेनें जाऊं लागली, तों पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं, वाटेनं एक मोळीविक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये ! तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ ? माझं पोट भरलं पाहिजे ! असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं व तीन आपल्या हातांत ठेविलीं. मनोभावें कहाणी सांगितली. चित्तभावें त्यानं ऐकली. त्याची लांकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं काय फळ ? काय वसा आहे तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशी, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! उतत नाहीं, मातत नाहीं. घेतला वसा टाकीत नाहीं ! तेव्हा राणीनं वसा सांगितला.
पुढं दुसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. माळ्याचा मळा पिकत नाहीं. विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हांक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक ! तो आला. राणीनें सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं. तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली, चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, बाई ! कहाणी ऐकल्याचं एवढं फळ. मग वसा घेतल्याचं काय फळं ? कसा वसा असेल तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पुढं तिसर्‍या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हां कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. एक म्हातारी आहे. तिचा एक मुलगा वनांत गेला होता. एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणले, आमच्या बाईची कहाणी ऐक ! ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करूं ? मी मुलांसाठीं रडतें आहे, बरं येतें. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्या प्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला, डोहांत बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा असेल तो मला सांग ! मग राणीनं तिलाहि वसा सांगितला.
पुढं चौथे मजलेस गेली. सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा ! उपाशी नाहीं, कांहीं नाहीं. काणा डोळा मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं, पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें आपण घेतलीं. राणीनें मनोभावें कथा सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा तो मला सांगा ! मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पाचव्या मुक्कामास घरीं आले. सैंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले, साती दरवाजे उघडले. लोहघंगाळ पाणी तापविलं, षड्‌रस पक्वान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घांसास केंस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे ? राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं, तिनें आदितवारी वळचणीखालीं बसून केंस विंचरले होते. काळं चवाळं, डोईचा केंस, वळचणीची काडी डाव्यां खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे ! राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो !’ ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी मंगळागौरीची



कहाणी मंगळागौरीची

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आण. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाहीं, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळीं वस्त्रं परिधान कर, रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत, आंत देवीची मूर्त आहे. मनोभावं पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर-दारं आहेत, गुरं-ढोरं आहेत, धन-द्रव्य आहे, पोटी पुत्र नाहीं म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झालें आहे तर तें तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलिस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे ! त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपति आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खालीं उतरून पाहूं लागला तों आपला मोटेंत आंबा एकच आहे. असं चारपांच वेळा झालें. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणें नाहीं असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. कांही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जातां जातां काय झालं ? वाटेत एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीच भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी म्हणू लागली – काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करिते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हें भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आई-बापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू; म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरजं लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे ! तिनें सर्व तयारी केली. दृष्टान्ताप्रमाणे घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहांटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालें ? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली. तों आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली हा माझा नवरा नाहीं, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो ? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनीं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्रान न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा ! ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी पाय धुताना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव‍र्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे ? त्यानं लाडवांचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा ! सासरमाहेरची, घरची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ! ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.