कुळधर्म
कुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।
मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥
आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.
रामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच.
जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते. त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.