Wednesday 31 December 2014

कहाणी शनिवारची

आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरांत बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासऱ्यांना वाढीत असे, उरलंसुरलं आपण खात असे. असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारीं आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊं घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं ! सासूसासरे देवाहून आलीं, तों घर कांहीं ओळखेना. हा वाडा कोणाचा ? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे या ! अग, तूं कोणाच्या घरांत राहिली आहेस ? तिनं सर्व हकीगत सांगितली. शनिवारीं एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाही. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. जेवूं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊं घालून जेवूं घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथे शनिवारीं त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. 

इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारांत उभी राहिलें. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरांत गेलीं. त्याना जसा मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

No comments:

Post a Comment